मुंबई : ग्राहकांना डिजिटल रकमेच्या देवाणघेवाणीचा सुलभ, सुरक्षित अनुभव देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ही संस्था आघाडीवर असून, डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ लक्षात घेऊन ‘एनपीसीआय’ने अॅप्लिकेशन्समध्ये विविध सुरक्षा नियंत्रणे वापरून ग्राहकांच्या सुरक्षिततेची प्रक्रिया सुरू केली आहे.
रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) १४ फेब्रुवारी २०१९ रोजी ‘डिजिटल पेमेंट इकोसिस्टीम’मध्ये रिमोट स्क्रीन अॅक्सेस अॅप्सद्वारे होणाऱ्या गैरप्रकारांबद्दल एक परिपत्रक काढले आहे. ‘एनपीसीआय’ ही संस्था ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी वचनबद्ध असून ‘आरबीआय’ने आपल्या परिपत्रकात नमूद केल्यानुसार तिचा या गोष्टीला पाठिंबा आहे. ‘एनपीसीआय’ला अलीकडेच अशापद्धतीच्या गैरव्यवहारांची माहिती मिळालेली असून, त्यानुसार संबंधित नियंक्षण संस्थांना त्याबद्दल कळविण्यात आले आहे.
ग्राहकाच्या मोबाइवर असणाऱ्या सर्व अॅप्लिकेशन्सना (पेमेंट, बॅंकिंग, वॉलेट्स, सोशल मीडिया) अशा प्रकारचा धोका फसवणूक करणाऱ्यांकडून उद्भवतो. फसवणूक करणाऱ्याने ग्राहकाच्या मोबाइलचा ताबा मिळवल्यानंतर त्याला बॅंकिंग व्यवहाराखेरीज ग्राहकाच्या मोबाइलवरून ऑनलाइन शॉपिंग करणे तसेच रेल्वे-विमानाची तिकीटेही आरक्षित करता येतात. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांची संख्या सध्या कमी असली, तरी ‘एनपीसीआय’ याबाबत जागरूक असून, ग्राहकांनीही त्याबद्दल काळजी घ्यावे, असे आवाहन या संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या बाबत बोलताना ‘एनपीसीआय’च्या रिस्क मॅनेजमेंटचे प्रमुख भारत पांचाळ म्हणाले, ‘अशा प्रकारच्या हल्ल्यांना प्रतिबंध घालण्यासाठी ‘एनपीसीआय’कडून सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी ग्राहक शिक्षणाद्वारे अशा हल्ल्यांना प्रतिबंध घालता येऊ शकतो; मात्र बॅंक आणि फिनटेक कंपन्यांसह सर्व इकोसिस्टीमने ग्राहकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही जागरूकता आपल्या खात्याचे किंवा कार्डाचा तपशील कोणाला सांगू नये, ओटीपी-पिन क्रमांकाबद्दल गुप्तता राखणे यासंदर्भात आहे. ‘युपीआय’ हा प्लॅटफॉर्म संपूर्णत: सुरक्षित असून, ‘टूएफए’शी जोडलेला आहे. ‘एनपीसीआय’द्वारे ‘युपीआय’ प्रणालीचे संरक्षण केले जात असून, गैरव्यवहारांवर लक्ष ठेवणे, तसेच गरज पडल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याचेही काम या संस्थेद्वारे केले जाते.’
याच गोष्टीला प्राधान्य देऊन ‘एनपीसीआय’ने वर्तमानपत्रे आणि रेडिओ या माध्यमांद्वारे ग्राहकांची सुरक्षा आणि जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात ‘एनपीसीआय’ने त्यासंदर्भात ट्विटरवर ‘थांबा. विचार करा. कृती करा’ नावाचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाद्वारे ग्राहकांकडूनच त्यांना जागृत करण्यासाठीच्या कल्पना मागविण्यात आल्या. हा उपक्रम म्हणजे ‘ग्राहकांकडून ग्राहकांसाठी’ या पद्धतीचा आहे.